Publish Date: Thu, 30 Jul 2020 (09:02 IST)
Updated Date: Thu, 30 Jul 2020 (09:05 IST)
राखी पौर्णिमेसाठी वेळेतच घरोघरी राख्या पोहचवण्यासाठी भारतीय डाक विभागाने अर्थात पोस्ट विभागाने यंदा संपुर्ण राज्यात विशेष व्यवस्था केली आहे. दरवर्षी राखी पोहचवण्यासाठी भारतीय टपाल विभाग मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभारतो तसेच टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील महाराष्ट्रातील डाक घरांत मोठ्या प्रमाणात राखीचे पार्सल बुक होतील अशी अपेक्षा आहे.राखी टपाल बुकिंग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व डाक घरांतून करण्यात आली आहे.
राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथेही सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी राखीचा सण डाक विभागासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. शहरात राहणाऱ्या भावंडांना विविध निर्बंधांमुळे या सणासाठी एकमेकांच्या घरी भेट घेणे शक्य होणार नाही. या कोविड काळात, पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. “स्पीडपोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद होईल” अशा घोषवाक्याने आनंद देण्याची विभागाची इच्छा आहे.राखीचा सण येत्या 3 ऑगस्ट 2020 (सोमवार) असल्यामुळे, महाराष्ट्र पोस्टल सर्कलने 2 ऑगस्ट, रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्य राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे.