Publish Date: Wed, 06 Jan 2021 (16:25 IST)
Updated Date: Wed, 06 Jan 2021 (16:27 IST)
“औरंगाबादचे संभाजीनगर मुळात हा विषय वादाचा नाही. संभाजीनगरचा प्रस्ताव आधीच ठेवलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुखही आहेत. महाविकास आघाडीतील घटक, संभाजीनगरच्या स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल यामध्ये शंका नाही. पण काही लोक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुणेकरांनी विद्यापीठाचे नामांतर आनंदाने स्वीकारलं होतं. मी उपसभापती असल्याने पुण्याच्या नामांतराबाबत कोणतीही एक भूमिका घेऊ शकत नाही,” असं विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
“सरकारवर टीका करणं हेच विरोधी पक्षाच्या नेत्यांचं काम आहे. जर त्यांनी टीका केली नाही तर ते नाटक कंपनीतीलच एक पात्र आहेत का अशी शंका वाटेल. प्रेक्षक म्हणून ते चांगली भूमिका निभावत आहेत. आमच्या भूमिकेवर शंका घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना धक्का बसला आहे. मी परत येईन ऐवजी आता परत जायची वेळ आली आहे,” असं उत्तर निलम गोऱ्हे यांनी फडणवीसांच्या टीकेला दिला.