Publish Date: Mon, 27 Apr 2020 (09:37 IST)
Updated Date: Mon, 27 Apr 2020 (09:40 IST)
सध्या राज्यात कोरोनाचे संकट असताना एका चुकीच्या अफवेमुळे पालघरमध्ये जमावाकडून साधुंची हत्या करण्यात आली होती, यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. अशाप्रकारे संचारबंदीच्या काळात जमावाकडून साधुंची हत्या होणे योग्य आहे का? कायदा आणि सुव्यवस्था कोणा एकाच्या हातात आहे का? हा प्रकार घडला तेव्हा पोलीस काय करत होते? एकूणच पालघर हत्याकांडातील सर्व घटनाक्रम विचार करायला लावणारा आहे, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
भारतात सर्वचजण भारतमातेची लेकरे आहेत. ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे. दोन्ही बाजूंनी भीती आणि द्वेष पसरवला जाऊ नये. विवेकपूर्ण आणि जबाबदार विचार करणाऱ्यांनी आपापल्या समुदायाला यापासून वाचवले पाहिजे. तसे झाले नाही तर देशात काय घडेल, असा सवाल मोहन भागवत यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, लॉकडाऊन असल्याने रात्री आडरस्त्याने जाण्याचा मृत्यू झालेल्य् साधूंचा प्रयत्न होता. धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी हे तिघेजण पोलिसांच्या ताब्यात असताना जमावाने त्या तिघांना ठेचून मारले होते. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अखेर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघर हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) सोपवला होता.