Publish Date: Sat, 02 Feb 2019 (09:37 IST)
Updated Date: Sat, 02 Feb 2019 (09:38 IST)
दोन कोटी रोजगारांचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र स्वातंत्र्यानंतर तरुणांची सर्वात मोठी फसवणूक मोदी सरकारनेच केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पाच वर्षांत देशात असहिष्णुता, जातीय तणावाच्या वातावरणामुळे गुंतवणूकीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नसल्याचेही पाटील म्हणाले. राम मंदिरासारख्या विषयाचे हे सरकार भांडवल करू पाहाते आहे, पण देशातील प्रत्येक माणसाला रोजगाराची चिंता अधिक आहे, असेही त्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या कथनी आणि करनीतले अंतर जनतेला समजले आहे. त्यामुळे आता जनता परिवर्तनासाठी निवडणुकीची वाट बघते आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.रिझर्व्ह बँकेकडून कर्ज मागणारे सरकार जनतेला काय देणार? माजी अर्थमंत्री - जयंत पाटील यांचा सवाल..
भाजपा सरकारने काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेकडे कर्ज मागितले होते. असे कर्ज मागणारे नरेंद्र मोदी यांचे सरकार जनतेला काय देणार, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले, तरी त्याचा फायदा हा काही कोटी लोकांनाच होणार आहे, याकडे लक्ष वेधताना मोदी सरकारने केलेल्या घोषणा अर्धवट असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. देशाची सत्ता टिकवण्यासाठी मोदी सरकारचा हा प्रयत्न आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.