Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महत्वाच्या बैठकीत आमदार कांदे गैरहजर ! पुन्हा रंगल्या नाराजीच्या चर्चा

suhas kande
, सोमवार, 12 डिसेंबर 2022 (21:28 IST)
नाशिक पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रखडलेल्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. मात्र या बैठकीत शिंदे गटाचे (बाळासाहेबांची शिवसेना) आमदार सुहास कांदे (suhas kande) आणि खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे दोघेही गैरहजर असल्याने काही दिवसांपासून सुरु असलेल्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या या बैठकीकडे आमदार छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही पाठ फिरवली आहे.
 
सुहास कांदे यांनी माध्यमांसमोर उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर शिंदे गटात नाराजी नाट्य सुरु असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. मात्र काही दिवसानंतर हा मुद्दा काहीसा थंडावला. मात्र आता पुन्हा कांदे आजच्या बैठकीत गैरहजर राहिल्याने त्यांची नाराजी कायम असल्याच्या चर्चांना हवा मिळत आहे. सुहास कांदे यांनी याआधी माध्यमांसमोर त्यांना ‘बैठकीला बोलावले जात नाही’, असा आरोप करत नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान आजही ते या बैठकीला गैरहजर असल्याचं दिसून येत आहे.
 
आमदार सुहास कांदे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यासह छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ हे देखील गैरहजर आहेत. दरम्यान माजी मंत्री छगन भुजबळ मुंबईत, तर खासदार हेमंत गोडसे दिल्लीत असल्याची माहिती मिळत आहे. तर शरद पवार यांचा जन्मदिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील अनुपस्थित असल्याचे चित्र दिसून येत आहे.
 
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला 
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, खासदार हेमंत गोडसे गैरहजर
आमदार छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांचीही बैठकीकडे पाठ
सुहास कांदे गैरहजर राहिल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा कायम
बैठकीला बोलावले जात नाही असा आरोप करणारे आमदार सुहास कांदे गैरहजर
काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. पदाधिकारी निवडताना पालकमंत्र्यांनी म्हणजेच दादा भुसे यांनी आपल्याला डावललं. आम्हाला विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला होता. त्यासोबतच ‘बैठकींना बोलावले जात नाही’, असा देखील आरोप करत नाराजी व्यक्त केली होती.

Edited By-Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकात नऊ वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला