Publish Date: Mon, 24 Apr 2023 (21:35 IST)
Updated Date: Mon, 24 Apr 2023 (21:40 IST)
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर टीका केली होती. हे सरकार १५ दिवसांत कोसळणार, असा दावा संजय राऊतांनी केला होता. मात्र, जर सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाविरोधात निर्णय घेतला तर त्यांची आमदारकी जाईल. त्यानंतर दुसरे मुख्यमंत्री येतील, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीत आजही एकजूट आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा त्रुटी नाहीयेत. संजय राऊत हे दिल्लीत आहेत. ते अगदी अंतर कोटामध्ये काम करतात. तसेच ते संपादकही आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे अशी काही माहिती येते. परंतु ही माहिती सध्यातरी माझ्याकडे नाही. मुख्यमंत्री बदलला जाणार अशीही परिस्थिती नाही. पण १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निकाल जर सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाविरोधात निर्णय घेतला तर त्यांची आमदारकी जाईल. त्यामध्ये एकनाथ शिंदेंचा देखील समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे गेले तर दुसरे मुख्यमंत्री येतील, असं छगन भुजबळ म्हणाले.
या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. त्यांच्याविरोधातच निकाल जाईल, याची खात्री कोणालाही नाही. जर दुर्दैवाने निकाल त्यांच्या विरोधात गेला आणि मुख्यमंत्रीपद देखील गेलं तरी आजचं जे सरकार आहे. त्यांना १६५ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यातील १६ जरी गेले तरी १४९ आमदार शिल्लक राहतात. त्यामुळे सरकार त्यांचंच राहिल. मुख्यमंत्री पद असलेली व्यक्ती बदलू शकते पण सरकारला धोका नाही, हे माझं स्वत:चं मत आहे, छगन भुजबळ यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor