Publish Date: Fri, 21 Sep 2018 (09:30 IST)
Updated Date: Fri, 21 Sep 2018 (09:32 IST)
हजारो शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेन विरोधात दाखल केली याचिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई –अहमदाबाद बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महाराष्ट्रातून या प्रकल्पाला आधीपासूनच शेतकऱ्यांचा विरोध होत होता, मात्र आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्येही या प्रकल्पाला विरोध होऊ लागला आहे. गुजरात हायकोर्टात हजारो शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात याचिका दाखल केली असल्याची बातमी बीबीसी मराठीने प्रसिद्ध केली आहे.
या प्रकल्पात होणाऱ्या भूमिअधिग्रहणामुळे लाखो शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे या शेतकऱ्यांनी याचिकेत म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे नेते छगन भुजबळ, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आणि इतर प्रमुख नेत्यांनी सरकारला प्रकल्पाविषयी धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विकासाला विरोध नाही मात्र आधी सामान्यांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, अशी भूमिका वेळोवेळी पक्षाच्या नेत्यांनी मांडली आहे.