Publish Date: Wed, 05 Jun 2019 (17:40 IST)
Updated Date: Wed, 05 Jun 2019 (17:43 IST)
मुंबईच्या वाहतूक कोंडीने आता जागतिक विक्रम केला आहे. जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर म्हणून मुंबईची ओळख झाली आहे. त्यामुळे नकोअसलेला विक्रम मुंबईच्या नावे झाला आहे. ‘टोमटोम ट्राफिक इंडेक्स २०१८’च्या सर्व्हेतून हा निष्कर्ष समोर आला आहे. जगभरातील ५६ देशांतील सर्वाधिक वाहतूककोंडी असलेल्या ४०३ शहरांचा सर्व्हेमध्ये अभ्यास करण्यात आला आहे. जगभरातील ४०३ शहरांमधील वाहतुकीचा वेग आणि वाहतूक कोंडीसंदर्भातील पाहणी करुन निरिक्षणे नोंदवली आहेत.
सर्व्हेतील निरिक्षणानुसार वाहतूककोंडीमध्ये मुंबई अव्वल स्थानावर आहे. तर त्यानंतर अनुक्रमे बोगोटा, लीमा, नवी दिल्ली आणि मॉस्को या शहरांचा नंबर लागतो. मुंबईकरांना कोणतेही अंतर पार करण्यासाठी एकूण वेळेपेक्षा ६५ टक्के अधिक वेळ लागतो. तर दिल्लीत ५८ टक्के अधिक वेळ लागतो. मुंबईत एकेकाळी ८० टक्के असलेला हा सार्वजनिक वाहतुकीचा वाटा आजमितीला ६० ते ६५ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. खासगी गाडय़ा, दुचाकी वाहने, ऑटो, टॅक्सी यांचा २० टक्क्यांवरून आता ३५ ते ४० टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे