Publish Date: Fri, 17 Feb 2017 (14:29 IST)
Updated Date: Fri, 17 Feb 2017 (14:31 IST)
मुंबई निवडणुकीच्या तोंडावर सेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेंकावर तोंडसुख घेण्याची कोणतीही संधी सोडत नसून त्यांच्यातील हेव्यादाव्यांवर खा. सुप्रिया सुळे यांनी घणाघाती टीका केली. मालाड येथील सभेत सुप्रिया सुळे यांनी चौफेर फटकेबाजी करत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. वॉर्ड क्र. ३८ वैभव बराडकर आणि वॉर्ड क्र. ४२ साठी धनश्री बराडकर यांच्या प्रचारार्थ मालाडमध्ये सुप्रिया सुळे यांनी सभा घेतली. यावेळी आमदार विद्या चव्हाण, आमदार हेमंत टकले, मुंबई प्रदेश युवती अध्यक्ष आदिती नलवडे , उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंह उपस्थित होते. शिवसेना-भाजपपेक्षा कोणत्याही सिरीयलमधले लोक कमी भांडत असतील, असा टोला सुळे यांनी लगावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात खड्डे झालेत, तर मुख्यमंत्री म्हणतात की खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे ते कळत नाही, पण नेमका याच्याशी आपला संबंध काय हे लोकांनाच कळेनासे झाले आहे, असे सुळे म्हणाल्या.