Publish Date: Mon, 23 Nov 2020 (15:40 IST)
Updated Date: Mon, 23 Nov 2020 (15:42 IST)
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे शपथविधी झाला होता. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्या शपथविधीवर भाष्य केलं असून आता पहाटे शपविधी घेण्याची गरज पडणार नाही असं म्हटलं आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
“जे झालं ते झालं. पण आता तुम्हाला ज्यावेळी शपथविधी पाहण्यास मिळेल तेव्हा पहाटेची वेळ नसणार आहे. योग्य वेळी शपथविधी पाहण्यास मिळणार आहे. त्या अडीच दिवसांच्या सोहळ्यावर पुस्तक लिहण्याचं काम सुरू आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात,” असंही यावेळी ते म्हणाले.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला सल्ला देताना म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा ज्येष्ठ नेते असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्याबद्दल बोलताना काही वाटत नाही. दुसऱ्या नेत्याकडे आपण जर बोट करत असाल तर चार बोटं आपल्याकडे हे लक्षात ठेवा”.