Publish Date: Thu, 06 May 2021 (18:09 IST)
Updated Date: Thu, 06 May 2021 (18:09 IST)
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा मोर्चा निघण्याची शक्यता आहे. राज्यातील लॉकडाऊन संपल्यावर १६ मे रोजी बीडमध्ये पहिला मोर्चा निघेल, अशी माहिती मराठा नेते आणि शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजाची बीडमध्ये बैठक पार पडली..
मराठा आरक्षणासाठी याआधी देखील मोर्चा निघाले होते. पण यावेळचा मोर्चा हा मुक मोर्चा नसणार आहे. असं विनायक मेटे म्हणाले . “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि आघाडी सरकारच्या नाकार्तेपणामुळे मराठा आरक्षण रद्द झालेलं आहे. या सरकारला ठिकाणावर आणण्याकरीता यााधी जसे मोर्चे काढण्यात आले होते, त्या प्रकारचं आंदोलन करण्याचा आजच्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. लॉकडाऊन १५ तारखेला संपल्यानंतर बीडमध्ये मोरचा निघणार आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यायला हवा. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नाव ठेवून वेळ काढण्यापेक्षा मुख्यमंत्री म्हणून काय निर्णय घेणार? कसं आरक्षण देणार? हे आधी सांगा नंतर पोपटपंची करा, अशी भूमिका आम्ही घेणार आहोत,” असं विनायक मेटेंनी सांगितलं.