Publish Date: Fri, 02 Dec 2022 (14:27 IST)
Updated Date: Fri, 02 Dec 2022 (14:28 IST)
सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून सुरू असलेल्या वादावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी “आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही,” असं मोठं विधान केलं. ते सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी (१ डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही. पोर्तुगीज, मोघल, ब्रिटिशांकडून या गोष्टी आल्या. महाराजांच्या काळातील एक ग्रंथ म्हणजे शिवभारत. त्यात ज्या गोष्टी सापडतात त्या आपल्यासमोर आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे काही दाखले, पत्रच नाहीत. त्यामुळे यातून काहीतरी शोधून लोकांपर्यंत इतिहास पोहचावा लागतो. त्यामुळे प्रतापराव गुजरांबरोबर कोण सहा लोक होते याला काही अर्थच उरलेला नाही.”
Edited by: Ratnadeep Ranshoor