Publish Date: Tue, 20 Aug 2019 (16:17 IST)
Updated Date: Tue, 20 Aug 2019 (16:31 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीकडून आलेल्या नोटीशीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर 22 ऑगस्ट रोजी मनसेचे कार्यकर्ते ईडी कार्यालकडे जाणार आहेत. पण त्या दिवशी आम्ही काय करणार आहोत याचा निर्णय आदल्या दिवशी घेतला जाईल. तूर्तास, आम्ही बंद मागे घेत आहोत, असे अविनाश जाधव यांनी सांगितले होते. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन 22 ऑगस्ट रोजीची आपली भूमिका स्पष्ट केली. आंदोलन हे आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे हेही आमचं एकप्रकारे आंदोलनच आहे. आमचं हे आंदोलन शांततेच्या मार्गाने असेल, पोलिसांनाही आमच्याशी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या समर्थनार्थ त्यांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रासह देशातील सर्वच कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमा होतील. मात्र, सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, याची काळजीही आम्ही घेणार आहोत. त्यासाठी, शांततेच्या मार्गानं आम्ही ईडी कार्यालायबाहेर जाऊ, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.