Publish Date: Wed, 24 Oct 2018 (17:32 IST)
Updated Date: Wed, 24 Oct 2018 (17:39 IST)
आपल्या राज्यात सरकारने अखेर 180 तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करत मदत सुरु केली, मात्र संपूर्ण महाराष्ट्रालाच तीव्रपाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे असे भयानक चित्र आहे. पालघर जिल्ह्यात तर अक्षरशः पाणीबाणी निर्माण झाली असून, सरकारी टँकरने मिळणाऱ्या पाण्यावर उड्या टाकणाऱ्या नायगावातील चाळकऱ्यांनी चक्क पाणी भरून पिंपांना कुलूप ठोकले आहे. रहिवाशांच्या या अफलातून आयडियामुळे चाळीचाळींमध्ये पाणी ‘तिजोरी बंद’ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पाणी प्रश्न किती भयानक आणि तीव्र आहे हे समोर येतंय. जून व जुलै महिना वगळल्यास पावसाने दडी मारली. केवळ 77 टक्के पाऊस झाला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका अनेक शहरांनाही बसू लागला आहे. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातीलही अनेक तालुक्यांमध्ये ठणठणाट आहे. त्यातच वसई-विरार पालिकेने अनेक चाळकऱ्याना अद्यापपर्यंत पाइपलाइनने पाणीपुरवठा केलेला नाही. त्यामुळे टँकरमाफियांचे चांगले दिवस आले असून पाण्यासाठी दर महिन्याला हजार ते दीड हजार रुपये खर्च करावे लागत आहे.