Publish Date: Wed, 28 Sep 2022 (15:53 IST)
Updated Date: Wed, 28 Sep 2022 (15:54 IST)
छापेमारीनंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफआय) केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआयच्या माध्यमातून देशात दुष्प्रचार सुरू होता. या संघटनेच्या निशाण्यावर काही लोक होते, देशात हल्ले करण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती या कारवाईनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआय सायलेंट किलर असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.
“पीएफआयविरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे उपलब्ध आहेत. देशात गैरकृत्य करण्यासाठी या संघटनेने आर्थिक यंत्रणा तयार केली होती. खूप मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडायची आणि या खात्यांमध्ये कुणाला संशय येऊ नये, यासाठी थोडे पैसे जमा करायचे”, असा प्रकार या संघटनेकडून करण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआयवर घातलेल्या बंदीसंदर्भात लवकरच राज्यांना अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. यानुसार पीएफआय आणि संबंधित सहा संघटनांवर कारवाई करू, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.