Publish Date: Thu, 02 Apr 2020 (13:38 IST)
Updated Date: Thu, 02 Apr 2020 (13:41 IST)
देशभरात लॉकडाऊन असून येत्या 14 एप्रिल रोजी 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारे सामूहिक सोहळे लांबणीवर टाकावे तसेच मुस्लिमांनी 8 एप्रिलचा 'शब-ए-बरात'चा विधी आपल्या घरात राहूनच करावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली असून त्यांनी महाराष्ट्रात निजामुद्दीनची पुनरावृत्ती होऊ देऊ नका असे आवाहन देखील केले.
आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून पुन्हा शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधला. त्यांनी सर्व धर्मीयांना सामूहिक कार्यक्रम टाळण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की तबलिगी जमातनं निजामुद्दीनचा सोहळा टाळायला हवा होता. तसेच 8 एप्रिल रोजी 'शब-ए-बरात' असून पूर्वजांची आठवण काढण्याचा हा दिवस असला तरी समाजातील नागरिक एकत्र येऊन हा विधी न करता घरातच नमाज अदा करावा.
तसेच येत्या 14 एप्रिल रोजी होणाऱ्या आंबेडकर जयंतीचे सामूहिक सोहळ्यांचं आयोजन लांबणीवर टाकावा, असंही ते म्हणाले.