Publish Date: Sat, 17 Aug 2019 (10:36 IST)
Updated Date: Sat, 17 Aug 2019 (10:40 IST)
मुंबईची तुंबई झालेली असताना मुंबईचे महापौर - विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांना जाब विचारणाऱ्या महिलेचा हात पिरगळल्याची घटना घडली होती. मात्र, आता या महिलेवर दबाव आणून तिला माघार घेण्यास भाग पाडले आहे. ही दबावशाही, झुंडशाही हे शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आ. विद्या चव्हाण यांनी केली आहे. दबावतंत्र वापरून असभ्य वागणूक करणे, हे महापौरपदाला अशोभनीय आहे. अशा महापौरांची हकालपट्टी करण्याची गरज होती. परंतु अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री यांनी या महापौरांचा समाचार घ्यावा आणि त्यांची हक्कालपट्टी करावी, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आम्ही महिला स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.