Publish Date: Mon, 28 Sep 2020 (08:38 IST)
Updated Date: Mon, 28 Sep 2020 (08:41 IST)
राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. विद्या प्राधिकरणातर्फे ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम होणार आहे.
यंदा को]रोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालये सुरू करता आलेली नाहीत. परिणामी शिक्षणाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करावी लागत आहे.
ऑनलाइन शिक्षणासाठीच्या साधनसुविधांची मर्यादा लक्षात घेऊन एकाच वेळी राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दूरदर्शनचा वापर करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून करण्यात येत होता. त्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी मे महिन्यात केद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे दूरदर्शनवर वेळ मिळण्यासाठी पत्रही लिहिले होते. मात्र त्या वेळी दूरदर्शनवर कार्यक्रम सुरू झाले नाहीत.
विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर पाटील म्हणाले, की नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यासाठी दूरदर्शनकडून ऑक्टोबरपासून वेळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या प्रसारणाची वेळ वगैरे तपशील स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. शैक्षणिक कार्यक्रमांचे काही भाग तयार करण्यात आले आहेत. तसेच पुढील भागांसाठीचे चित्रीकरणही सुरू आहे.