Publish Date: Sun, 11 Sep 2022 (10:38 IST)
Updated Date: Sun, 11 Sep 2022 (10:42 IST)
राज्यात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उद्यापासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
मागच्या चार दिवसांपासून हवामान खात्याकडून पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसाने थैमान घातले आहे. हवामान विभागाकडून राज्यात पावासाचा इशारा देण्यात आला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागाने पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.