Publish Date: Thu, 09 Jun 2022 (15:40 IST)
Updated Date: Thu, 09 Jun 2022 (15:41 IST)
राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी विलंब होत आहे. तरी पुढील 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार असल्याची माहिती आहे.
10 जून पासून कोकणसह मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात आणि घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण आहे आणि पावसाची रिपरिप सुरू आहे. तर उद्यापासून म्हणजे 10 जूनपासून या शहरांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावू शकतो.
यलो अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने आज पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
या ठिकाणी उष्णता
विदर्भातल्या काही भागांमध्ये तसेच चंद्रपूर गोंदिया, वर्धा, नागपूर, ब्रह्मपुरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा वाढलेला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे.
उत्तर कोकणात 12 जूनपर्यंत पावासाचा अंदाज देण्यात आला असून दक्षिण कोकण आणि गोवा येथे दोन दिवस तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यालाही मुसळधार पावसाचा इशारा असून पूर्व-पश्चिम विदर्भातही हवामान खायात्याकडून पावासाचा इशारा देण्यात आला आहे.