Publish Date: Mon, 02 May 2022 (07:24 IST)
Updated Date: Mon, 02 May 2022 (07:26 IST)
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्य कडाक्याच्या उष्ण लाटेतून जात आहे. त्यामुळेच अनेक शहरांमध्ये ४४ अंशांच्याही पुढे तपमान गेले आहे. परिणाम कडक ऊन आणि घामाने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, आता राज्याच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, येत्या ३ आणि ४ मे रोजी विजांच्या कडकडाट आणि गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा वेग राहणार आहे. खासकरुन पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.