Publish Date: Thu, 19 Jul 2018 (16:22 IST)
Updated Date: Thu, 19 Jul 2018 (16:25 IST)
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला. राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले. भाजपावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, भाजपावाले रोज खिडकीत बसतात आणि तू येतो का, असं दुसऱ्या पक्षातील लोकांना विचारत बसतात असे सांगितले.
मोदी टुर्स अँड ट्रॅव्हल्सने परदेशवारी केल्या. पण परदेशातून एकही रुपया देशात यायला तयार नाही. आता निवडणुका जिंकणे कठीण दिसत असल्याने भाजपाकडून राम मंदिराचा विषय पुढे रेटला जात आहे. दंगली घडवून सत्तेत येण्याचा त्यांचा डाव आहे, या दंगलीमुळेच विप्रोचा प्रकल्प गेला, असा आरोप त्यांनी केला. भाजपा नुसतं खोटं बोलणार पक्ष आहे. पैसा आणि ईव्हीएमच्या जिवावरच हा पक्ष निवडून येत आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन बंद करुन पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे. मग भाजपाला त्यांचा जागा कळेल, असे त्यांनी म्हटले आहे.