Publish Date: Fri, 14 Jun 2019 (17:02 IST)
Updated Date: Fri, 14 Jun 2019 (17:13 IST)
पक्षश्रेष्ठींनी उदयनराजेंना आवरावे, अन्यथा आम्हाला पक्षातून बाहेर पडण्याची परवानगी द्यावी, असे त्यांनी म्हटले. असे सांगत त्यांनी नीरा-देवघर पाणी प्रश्नावरुन उदयनराजे यांनी केलेल्या टीकेला शुक्रवारी रामराजे नाईक निंबाळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. काही दिवसांपूर्वीच भगीरथ म्हणून घेणाऱ्यांनी लाल बत्तीचा वापर केला आणि लोकांची खिल्ली उडवण्यापलीकडे काही केले नाही, त्यांना देवसुद्धा माफ करणार नाही, असे उदयनराजेंनी म्हटले होते.
या टीकेला प्रत्युत्तर देताना रामराजे निंबाळकर यांनी म्हटले की, उदयनराजेंनी मला स्वयंघोषित भगीरथ म्हटले. मला वाटतं की, ते स्वयंघोषित छत्रपती आहे. त्यामुळे आपण दोन्ही स्वयंघोषित लोकांनी एकमेकांशी वाद घालणे योग्य नाही. तुम्हाला कधी वेळ मिळाला आणि तुमचं मन थाऱ्यावर असेल तर एकदा खंडाळ्याच्या पलीकडे खिंडीजवळ नीरा उजवा कालवा आहे. उदयनराजेंनी त्याठिकाणी आपल्या लँडक्रुझर गाडीतून जावे आणि डाव्या दिशेने वळून आंदरूडपर्यंत प्रवास करावा. त्यावेळी उदयनराजेंना समजेल की, ज्या भागाला नीरा- देवघर योजनेतील पाणी कधीही मिळू शकत नव्हते अशा भागापर्यंत १०-१५ बोगदे पाडून मी कृष्णेचे पाणी पोहोचवले. त्यामुळे काहीजण मला भगीरथ म्हणत असतील किंवा मी गेली १५ वर्ष लाल दिव्याच्या गाडीतून फिरत असेल तर तुम्हाला दु:ख होण्याचे कारण काय आहे, असा सवाल रामराजे निंबाळकर यांनी उदयनराजेंना विचारला.