Publish Date: Sat, 26 Jun 2021 (19:58 IST)
Updated Date: Sat, 26 Jun 2021 (20:00 IST)
आरक्षण, संविधन आणि लोकशाही संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश आहे. संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपवण्यासाठीच काम करत आहे," असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले यांनी हे मत व्यक्त केले आहे.
याबाबत नाना पटोले म्हणाले, "देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्याकडे ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मागितला. पण केंद्रानं तो दिला नाही. केंद्राने तो डेटा दिला नसल्यानं सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलं."
"ओबीसींचं आरक्षण रद्द होण्याला केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण घालवून त्यांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपचा डाव आहे," असा आरोप पटोलेंनी केला.