Publish Date: Wed, 08 Aug 2018 (09:32 IST)
Updated Date: Wed, 08 Aug 2018 (09:34 IST)
हिंदूंच्या सण-उत्सवांबाबत काँग्रेस राजवटीत मुस्कटदाबी व्हायची असे आरोप आधी झाले. पण आता भाजप राज्यात ती जरा जास्तच होताना दिसत आहे. हिंदूंच्या राज्यात गणरायांना मुकाटपणे अत्याचार सहन करावा लागत आहे अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे भाजपा सरकारवर बरसले आहेत. गिरगावात पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं गणेशोत्सवाचा मंडप उखडला. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी 'सामना'मधून फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
'सांगली, जळगाव महापालिका विजयाची धुंदी उतरली असेल तर गणपती उत्सवाच्या बाबतीत सुरू असलेल्या मोगलाईची दखल राज्याच्या लाडक्या, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल. महापालिकेच्या एका टिनपाट वॉर्ड ऑफिसरनं गिरगावातील गणेशोत्सवाचा मंडप उखडताच त्याच्या कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी दणका दिला आहे. थोडी ठोकाठोक झाली, पण श्री गणरायाचे आगमन सुकर व्हावं व हिंदुत्वाचा मान राहावा म्हणून शिवसैनिकांनी याप्रकरणी नवे खटले अंगावर घेतले आहेत. गणेशोत्सवात, विशेषतः खास हिंदूंच्याच सण-उत्सवात न्यायालय, प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे असे अडथळे येत असतील तर या देशाचे भविष्य काय?' असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला आहे.