Publish Date: Wed, 03 Aug 2022 (07:42 IST)
Updated Date: Wed, 03 Aug 2022 (07:44 IST)
राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही? यावरून आता महाराष्ट्रातील राजकारणात तर्क -वितर्क लावले जात आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे.
संजय राऊत यांच्या अटकेप्रकरणी शरद पवारांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही, याचा अर्थ संजय राऊतांचा कार्यक्रम संपला आहे, असं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
संजय राऊतांच्या अटकेप्रकरणी शरद पवार यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही, याबाबत विचारलं असता, संजय शिरसाट म्हणाले, “काल मी व्हॉट्सअॅपवर एक व्हिडीओ पाहिला होता. ज्यामध्ये शरद पवारांनी ज्यांचा हात पकडला, ते सर्वजण तुरुंगात गेल्याचं चित्र दाखवलं होतं. शरद पवारांनी संजय राऊतांचा हातात हात घेतला ते तुरुंगात गेले, नवाब मलिकांचा हातात हात घेतला तेही तुरुंगात गेले आणि अनिल देशमुखही तुरुंगात आहेत. त्यामुळे लोकांना आता शरद पवार यांच्या हातात हात मिळवावा का? याची भीती वाटायला लागली आहे.”