Publish Date: Wed, 26 Feb 2020 (15:11 IST)
Updated Date: Wed, 26 Feb 2020 (15:15 IST)
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव भाजपकडून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सादर करण्यात आला होता. पण विधानसभेत सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळण्यात आला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नियमात बसत नसल्याचं सांगत हा प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र हा प्रस्ताव मांडण्यासाठी भाजपनं कामकाज सुरू झाल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र 'भाजपप्रणित केंद्र सरकारनं सावरकरांना भारतरत्न जाहीर करावा त्यानंतर राज्य सरकार पंतप्रधान मोदी आणि राज्यातल्या भाजपच्या नेत्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार,' असल्याचा टोला संसंदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी लगावला.
'राज्य, देश उभारणीत ज्या महान व्यक्तींचं मोलाचं योगदान आहे त्यांचा आदर करावा. चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात जर एखादी चर्चा येणार असेल तर त्याबाबत कुणालाही आक्षेप घेण्याचं कारण नाही. ज्या व्यक्ती हयात नाहीत अशा व्यक्तींबद्दल अनावश्यक विधानं करून गैरसमज पसवण्याचं काही काम नाही. सावरकरांचं योगदान नाकारता येणार नाही.' अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सावरकरांचा पहिलाच स्मृती दिन नाही. त्यामुळेच आता प्रस्ताव का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केला.