Publish Date: Sat, 29 Aug 2020 (16:05 IST)
Updated Date: Sat, 29 Aug 2020 (16:07 IST)
अनलॉकचा तिसरा टप्पा ३१ ऑगस्टला पुर्ण होणार असून, त्यानंतर अनलॉक ४ जाहीर केला जाणार आहे. अनलॉक ४मध्ये अर्थात सप्टेंबरमध्ये राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली.
गायकवाड म्हणाल्या, “३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकार शाळा सुरू करू शकत नाही. कारण केंद्रीय गृहमंत्रालय यासंदर्भातील निर्णय घेते. शाळा-महाविद्यालयांसह सर्वच गोष्टी सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य सरकारला शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली. तर प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. दहावीच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आधी दहावीचे वर्ग सुरू करू. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इतर इयत्तांसाठी शाळा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.