Publish Date: Tue, 02 May 2023 (20:34 IST)
Updated Date: Tue, 02 May 2023 (20:37 IST)
आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना घरी जाण्य़ाचे आवाहन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलं. निर्णयावर फेरविचार करण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा वेळ लागेल. राजीनाम्याचे सत्र थांबवा असे शरद पवार यांनी सांगितले आहे.मात्र जर कार्यकर्ते आंदोलनाच्या भूमिकेत असतील तर निर्णय बदलाचा विचार होणार नाही. त्यामुळे तुम्ही घरी जावा असे शरद पवार यांनी सांगितले. तुम्ही जर आंदोलन करणार असाल तर साहेबांचा निर्णय बदलणार नाही. त्यामुळे शांत रहा आणि घरी जावा अशी विनंती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली.शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पाडल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.वाय.बी.चव्हाण सेंटरबाहेरून ते बोलत होते.यावेळी सुप्रिया सुळे, छगन भूजबळ, जयंत पाटील. रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलकांना शांत राहण्याची विनंती करताना अजित पवार म्हणाले की, कुणीही आंदोलन, रास्ता रोको, उपोषण करू नका. किंवा राजीनामा देऊ नका . कोणाचाही राजीनामा मंजूर होणार नाही. तुम्ही जर शरद पवार यांना मानत असाल तर एकही कार्यकर्ता रस्त्यावर दिसणार नाही. तुम्हाला त्यांच ऐकायला लागेलचं.तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीला बाधा येणार नाही. साहेबांना त्रास होईल असं वागू नका. आंदोलन करणारे लोक उपाशी आहेत याचा मानसिक त्रास शरद पवार यांना होत आहे असा निरोप अजित पवार यांनी दिला असल्याचे अजित पवार म्हणाले.
Edited By - Ratnadeep Ranshoor