Publish Date: Sun, 10 Jul 2022 (14:36 IST)
Updated Date: Sun, 10 Jul 2022 (14:43 IST)
"उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर अजूनही शिवसेना पुन्हा एक होऊ शकते. मातोश्रीने फक्त संजय राऊतांसारख्यांना बाजुला केलं पाहिजे," असं विधान शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केलं आहे.
"संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली, मी अजून शिवसेनेतच आहे," असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांपैकी फक्त शिवतारेच नाही तर अनेक आमदारांनी आतापर्यंत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याची टीका बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले की, "माझं असं मत आहे की, संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते असले तरी ते शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे ते असं बोलतात. हे माझं मत आहे. ते खरं आहे की खोटं, हे मला माहीत नाही. ही काही टीका नाहीये, पण ज्याप्रमाणे ते वर्तन करत आहेत. त्यांनी पुढे जाऊन असं वर्तन करून नये."