Publish Date: Tue, 13 Feb 2018 (09:39 IST)
Updated Date: Tue, 13 Feb 2018 (09:40 IST)
शिवसैनिक पक्षावर चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांचा संताप उफाळून आला आहे. मुंबईत राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी विचारला आहे. ईशान्य मुंबईची 'नवनिर्माण शिवसेना' असे नाव देत नाराज शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये बॅनरबाजी केली आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत तणाव वाढला आहे. 'राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही?' असा सवाल शिवसैनिकांनी होर्डिंगच्या माध्यमातून विचारला आहे.
ईशान्य मुंबई विभाग प्रमुख मा. श्री. राजेंद्र राऊत साहेब यांच्या धोरणानुसार ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक, सहसंघटक व शाखाप्रमुख यांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याचवेळी लक्षात आले की, यातील नियुक्त्या करण्यात आलेले बरेच जण अनेक पक्ष फिरुन संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून किंवा विरोधात काम करणाऱ्यांना मा. विभाग प्रमुखांनी संघटनेची सन्मानाची पदे बहाल केली आहेत. याचा अर्थ असा होतो की सध्या शिवसेनेत या पदांच्या लायकीचा निष्ठावंत शिवसैनिक नाही. त्यामुळे मा. राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आलेल्या लोकांना महत्त्वाचे पदे बहाल करण्यात आली. त्या ऐवजी मा. राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही?