Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोलापूर : बल्कर पलटी झाल्याने चार शाळकरी मुलांचा चिरडून मृत्यू

accident
, शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (07:59 IST)
सोलापूर : सिमेंट बल्कर ट्रक पलटी होऊन घडलेल्या अपघातात त्याखाली चेंगरून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (आ.) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर बस स्टॉपवर शुक्रवारी दुपारी घडली. त्यानंतर ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली. मृताच्या कुटुंबीयांचा आणि महिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या सिमेंट बल्कर ट्रकला उचलण्यासाठी चार-पाच क्रेनची मदत घ्यावी लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
 
औज (आ.) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर बस स्टॉपवर सिमेंट भरून चाललेला बल्कर ट्रक पलटी झाला. त्या खाली ४-५ मुले चेंगरल्याची भीती व्यक्त करण्यात आली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांना समजावून पुढील मदत करण्यास सुरुवात करण्याची प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांचा रोष अनावर होताच गुन्हे दाखल करण्याची तंबी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या बल्करखाली एका चिमुकलीसह ४ जण चिरडून जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. यातील चिमुकलीसह दोघांची ओळख पटली असून अन्य दोघे परगावचे असल्याचे सांगण्यात आले.
 
प्रज्ञा बसवराज दोडतले (इयत्ता तिसरी, ९) आणि विठ्ठल शिंगाडे (६०, दोघे रा. औज) अशी मृतांची नावे आहेत. अन्य दोघे परगावचे असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात होते. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. औज दुर्घटनेतील मृतांना आर्थिक मदत देऊन कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले.
 
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत, संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती देताच त्यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना मदतीचे व गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख आणि जखमींना ५० हजार देण्याचे आदेश दिले.

Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात तापमानात वाढ ; मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरला