Publish Date: Sat, 08 Aug 2020 (09:06 IST)
Updated Date: Sat, 08 Aug 2020 (09:10 IST)
गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली. नुकतीच एसटी गाड्या सोडण्याचीही मंजुरी दिल्यानंतर आता रेल्वेही कोकणसाठी धावतील.
राज्य सरकारने मध्य रेल्वेला दिलेल्या पत्रात कोकणसाठी विशेष रेल्वेंचे नियोजन करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे मागणीनुसार गाड्या सोडतानाच कन्फर्म तिकीट आणि ई-पास असलेल्यांनाच यातून प्रवासाची मुभा देण्याच्या सूचना आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार रेल्वे प्रवासादरम्यान शारीरीक अंतर राखणे, सॅनिटाईज करणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आम्ही लवकरच माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
२२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. १४ दिवसांच्या विलगीकरणाच्या अटीमुळे गेल्या आठवड्याभरापासून खासगी वाहनांनी अनेकांनी कोकण गाठले. त्यापाठोपाठ नुकतेच एसटी सोडण्याचीही घोषणा करण्यात आली. सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन्स सोडण्यात आल्या आहेत.