Publish Date: Wed, 06 Mar 2019 (09:06 IST)
Updated Date: Wed, 06 Mar 2019 (09:12 IST)
नाशिक शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. येत्या अर्थसंकल्पात शहराच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रयतेचे राज्य आणण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. दारिद्र्य रेषेवरील गरजूंना रास्त किंमतीत धान्य उपलबध करुन देण्यात येत आहे. बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन काम करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन गरीबांच्या कल्याणासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील 10 कोटी नागरिकांना 5 लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, प्रधानमंत्री आवास योजना अशा अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला चालना मिळाली असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
फरांदे यांनी प्रास्ताविकात विकासकामांची माहिती दिली. मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री महोदयांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे नाशिकच्या विकासाला संधी मिळाली आहे असे त्यांनी सांगितले.एकूण 45 कोटी खर्चाच्या विकासकामांचे भूमिपुजन मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.