Publish Date: Tue, 08 Nov 2022 (08:55 IST)
Updated Date: Tue, 08 Nov 2022 (08:56 IST)
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खालच्या भाषेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तार यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील निवासस्थानावर दगडफेकही करण्यात आली. यानंतर आता या वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली असून, कारवाईचे निर्देश दिले आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहलं आहे. त्यात “मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्धार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे.”
“याप्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशी सूचना आयोगाकडून देण्यात आली आहे,” असे रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.
Edited by : Ratnadeep Ranshoor