Publish Date: Thu, 22 Nov 2018 (12:25 IST)
Updated Date: Thu, 22 Nov 2018 (12:29 IST)
दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा आता मोबाईल अॅपवर होणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली आहे. अशाप्रकारे कल चाचचणी परीक्षा मोबाईलच्या माध्यमातून घेण्याबाबतचे प्रशिक्षणही शिक्षकांना देण्यात आले आहे. दहावीनंतर कुठले क्षेत्र निवडायचे याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. त्यासाठी ही कल चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरते.
शिक्षण विभाग, विद्या प्राधिकरण आणि शामची आई फाऊंडेशन या तिघांनी मिळून हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात 2 मास्टर ट्रेनर तयार करण्यात आले आहेत. हे मास्टर ट्रेन प्रत्येक जिल्हय़ातील शाळांना संबंधित मोबाईल अॅप कसे हाताळायचे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मोबाईल अॅपच्या कल चाचणीसाठी विभाग, जिल्हा, तालुका स्तरावर समन्वयक नेमण्यात येणार आहे. ही कल चाचणी परीक्षा शाळांमध्येच घेण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेतील सर्व जबाबदार कर्मचाऱ्यांना ओटीपी आणि इतर माहितीसाठी मोबाईल नंबर नोंदवावे लागणार आहेत. तालुकास्तरावरील प्रशिक्षणासाठी प्रत्येक शाळेतील शिक्षकांना बोलावण्यात येणार असून मुंबईत 3 डिसेंबर रोजी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.