Publish Date: Mon, 28 Jun 2021 (16:18 IST)
Updated Date: Mon, 28 Jun 2021 (16:20 IST)
महाविकास आघाडीमधील तीन पक्षांमध्ये समन्वय नसल्याची टीका विरोधी पक्ष भाजप करत आहेत. यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील यावर बोलताना भांड्याला भांडं लागत असलं तरी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
ही तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. तीन पक्ष स्वतंत्र आहेत. या पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या असू शकतात. राजकीय विचारधारा वेगळी असू शकते. पण हे सरकार किमान समान कार्यक्रमावर आहे. जो कार्यक्रम राज्याच्या हितासाठी तयार करण्यात आला आहे, त्या किमान समान कार्यक्रमावार महाविकास आघाडीचं काम सुरु आहे. अधूनमधून भांड्याला भांडं लागत असेल, ते लागलंही पाहिजे. तरच तो संसार असतो, असं संजय राऊत म्हणाले.
याआधी सुद्धा पाच वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपचं सरकार होतं. तेव्हा ही अशी भांडी लागत नव्हती तर फूटत होती. तरी ते पाच वर्ष चाललं. त्यामानाने हे उत्तम चाललेलं सरकार आहे. काही अडचण नसून पूर्ण कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.