Publish Date: Thu, 30 Jun 2022 (15:02 IST)
Updated Date: Thu, 30 Jun 2022 (15:03 IST)
नाशिक प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी बागवाणपु-यातील तीघांना दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. विक्रम उर्फ पप्पू रूपचंद तसांबड (३०), पिंटू उर्फ प्रदिप परशराम तसाबंड (२५) व संदेश उर्फ सोनू प्रकाश साळवे (२७ रा.तिघे महालक्ष्मी चाळ,बागवानपुरा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २०१८ मध्ये घडली होती. व्दारका भागात पूर्व वैमनस्यातून बापलेकावर हा हल्ला करण्यात आला होता. हा खटला जिल्हा न्यायाधीश तथा अप्पर सत्र न्यायाधिश आदिती कदम यांच्या कोर्टात चालला.
याप्रकरणी १८ नोव्हेंबर २०१८ ला सिध्दार्थ सुरेश दलोड (२५ रा.सिध्दार्थ बिल्डींग,महालक्ष्मी चाळ) या युवकाने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबईनाका पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक एम.जी.वराळ यांनी करून पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकारतर्फे अॅड. सुलभा सांगळे यांनी काम पाहिले. फिर्यादी पंच आणि साक्षीदार यांनी दिलेली साक्ष व तपास अधिका-यांनी सादर केलेले पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने तिघा आरोपींना दहा वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
सिध्दार्थ दलोड व सुरेश दलोड हे पितापुत्र १८ नोव्हेंबर २०१८ रोजी व्दारका परिसरातील गोदावरी हॉटेल पाठीमागील मीरकर कॉम्प्लेक्स येथे असतांना, संशयितांनी त्यांना गाठून जुन्या वादाची कुरापत काढून दलोड पितापुत्रावर धारदार चॉपरने हल्ला केला होता. या घटनेत सुरेश दलोड यांच्या पोटावर तर सिध्दार्थ दलोड यांच्या पाठीवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी सिद्दार्थ दलोड यांचा आतेभाऊ सौरभ बागडी हा त्यांच्या मदतीला धावून आला असता त्यालाही संशयितांनी फायटरने मारहाण करून जखमी केले होते.