Publish Date: Tue, 05 Mar 2024 (11:24 IST)
Updated Date: Tue, 05 Mar 2024 (11:26 IST)
राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका मध्यमवयीन व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींची निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात रविवारी ही घटना घडली. 50 वर्षीय अंबादास तलमले यांनी त्यांची 42 वर्षीय पत्नी अलका, 19 वर्षांची मुलगी प्रणाली तलमले आणि 17 वर्षांची मुलगी तेजू तलमले यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मारेकरी पती अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पती अंबादास याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. दरम्यान काल पहाटे क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यादरम्यान अंबादासचा संयम सुटला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. दरम्यान रागाच्या भरात अंबादासने पत्नी व दोन मुलींवर कुऱ्हाडीने वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाला.
या खुनाची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी तिन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. तसेच आरोपी अंबादास याला अटक केली.
पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. घटना घडली त्यावेळी अंबादास यांचा मुलगा घरी नव्हता, तो कामावर गेला होता.