Publish Date: Thu, 10 Feb 2022 (15:26 IST)
Updated Date: Thu, 10 Feb 2022 (15:27 IST)
सतत असणार्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एका शेतकर्याने नाद केला. त्याने तब्बल दीड एकरात 2 कोटी रुपये खर्च करुन विहीर बांधली. ही विहीर बनवण्यासाठी तब्बल 6 महिने इतका काळ लागला. मात्र आता पाऊस पडला नाही तरी शेती करता येईल. ही विहीर गुगल मॅपवर देखील स्पष्टपणे दिसत असून सध्या या विहीरीची एकच चर्चा आहे.
बीडच्या गेवराई तालुक्तयातील पाडळसिंगी गावाचे शेतकरी मारोती बजगुडे यांनी बारामाही पाणी पुरेल अशी योजना आखली. त्यांनी आपल्या दीड एकर शेतामध्ये विहीर बांधली. हे काम इतके सोप नव्हते, सुरुवातीला अनेक अडचणी आल्या परंतु त्यावर मात करत मारोती यांनी तीन वर्षांपूर्वी विहीर खोदण्यासाठी सुरुवात केली होती. या दरम्यानच्या काळात बजगुडे यांच्या शेतामध्ये 80 मजूर, 12 हायवा, 8 जेसीबी अशा यंत्रसामुग्रीसह मोठा लवाजमा होता. अखेर पाच परस खोली आणि एक एकराचा परिघ पूर्ण झाल्यावरच त्यांनी काम थांबवलेले आहे. यात 2 कोटींचा खर्च आला आहे.
41 फूट खोल आणि दोनशे दोन फूट रुंद असलेल्या या विहिरीमध्ये सध्या दहा कोटी लिटर एवढा पाणीसाठा त्यांनी करून ठेवला आहे. या विहीरीमध्ये दोन बोअर घेण्यात आले आहे. दोन वर्षे पाऊस पडला नाही तरीही या विहीरीतील पाण्यातून 50 एकर जमिनी भीजू शकते. तसेच या विहीरीमध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले आहे. या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे मारोतीराव बजगुडे यांनी सांगितले आहे. बजगुडे यांनी बांधलेली ही कदाचित राज्यातील सर्वात मोठी विहीर असावी.