Publish Date: Thu, 14 Mar 2024 (09:37 IST)
Updated Date: Thu, 14 Mar 2024 (09:40 IST)
मनसे नेते वसंत मोरे यांनी काल मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोरे यांच्या या निर्णयामुळे मनसेला पुण्यात मोठा फटका बसला.
पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नव्हती म्हणून पक्ष सोडण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला, असे वसंत मोरे म्हणाले. दरम्यान पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांना ठाकरे गट, अजित पवार गट आणि काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली. संजय राऊत यांनी थेट फोन करत त्यांना याबाबत विचारणा केली असल्याचे वृत्त आहे.
दुसरीकडे अजित पवार गटातील रूपाली पाटील यांनी जाहीरपणे राष्ट्रवादीत स्वागत असल्याचे म्हटले. तर वसंत मोरे यांच्याशी दोन ते तीन पक्षांनी संपर्क साधला आहे. स्वत: वसंत मोरे यांनी ही माहिती दिली. “काँग्रेसकडून मला विचारणा करण्यात आली आहे, माजी आमदार मोहन जोशींचा फोन आला होता तसच उद्धव ठाकरे गटाने सुद्धा त्यांना ऑफर दिली आहे” असं ते म्हणाले. ते नक्की कोणत्या पक्षात जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor