Publish Date: Sat, 19 Jan 2019 (10:17 IST)
Updated Date: Sat, 19 Jan 2019 (10:25 IST)
राज्यातल्या शिक्षण विभागाकडून डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम वांग्चुक अशा तज्ज्ञ मंडळींना घेऊन आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आगामी काळात या बोर्डाला विशेष महत्त्व प्राप्त होईल, अशी योजना आखल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. विद्यार्थ्यांकडून घोकंपट्टी करून घेऊन त्यांची खोटी गुणवत्ता सांगणारी शिक्षणपद्धती बंद करून कौशल्य शोधून ते विकसित करणारे शिक्षण महाराष्ट्रात दिले जाईल, असेही ते म्हणाले.राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या (स्वायत्त) दुसऱ्या पदवीदान समारंभप्रसंगी ते बोलत होते.
शिक्षणात केलेल्या बदलाबद्दल सांगताना तावडे म्हणाले, दहावी, बारावीची फेरपरीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा पुढच्या वर्षांत संधी देण्याचा प्रयोग आपण यशस्वी केला. जूनमध्ये निकाल लागल्यानंतर जुलमध्ये परीक्षा घेऊन ऑगस्टमध्ये निकाल लावून ३५ हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तरीही जे अनुत्तीर्ण राहिले त्यांना प्रशिक्षण देऊन कौशल्य विकासाची संधी दिली व त्यांच्यावरील नापासाचा शिक्का पुसला असल्याचे त्यांनी सांगितले.