Publish Date: Tue, 31 Oct 2017 (10:26 IST)
Updated Date: Tue, 31 Oct 2017 (10:29 IST)
कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविक विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीत हजेरी लावतात. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पहाटे सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी कर्नाटकातील विजापूर येथील बळीराम चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्यांचा मान मिळाला.
कर्नाटक परिवहन विभागात कंडक्टर असलेल्या चव्हाण यांनी महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा असे साकडं विठूरायाला घातले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जनता सुखी आणि सुरक्षित राहू दे, असं साकडं विठूरायाला घातले.
दरम्यान, वारकऱ्यांच्या मागणीनुसार मंदिर समितीला सहअध्यक्षपद निर्माण केलं आहे, शिवाय समितीमध्ये रिक्त असलेल्या 3 जागांवरही वारकरी प्रतिनिधी भरले जातील, असे यावेळी पाटील यांनी सांगितले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने महसूल मंत्र्यांना चांदीची विठ्ठल मूर्ती देऊन तर मानाचे चव्हाण दाम्पत्याला प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.