Publish Date: Sat, 23 Apr 2022 (15:22 IST)
Updated Date: Sat, 23 Apr 2022 (15:26 IST)
टिक फॉर टॅकला आम्ही घाबरत नाही. टिक फॉर टॅकला उत्तर द्यायला गेली 27 वर्ष आम्ही समर्थ आहोत. पण कायद्याच्या चौकटीत राहून अभियान करण्याची आमची भूमिका आहे. लोकशाहीला लोकशाहीनं उत्तर देऊ. ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज भाजपचे मुंबईचे सर्व आमदार व खासदार यांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी आशिष शेलार बोलत होते.
भाजपचा पोलखोलचा कार्यक्रम हा परवानग्या घेऊन चाललेला कार्यक्रम आहे. अधिकृत सर्व परवानग्या घेऊन रस्त्यावर आणि मैदानात हा कार्यक्रम होत आहे. लोकशाहीच्या मार्गाने जनतेचे महत्त्वाचे प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची मांडणी आम्ही पोलखोलमधून करीत आहोत. मला वाटतं लोकशाहीमध्ये अधिकृत अशा चाललेल्या कार्यक्रमावर एखाद-दुसरा व्यक्ती येऊन हल्ला करणं, शिवीगाळ करणं हे नामर्दपणाचं लक्षण आहे.
लाड, साटम, तमीर सेल्व्हन या सर्व नेत्यांच्या सभेत जो दंगा घालण्याचा प्रयत्न केला, तो पोलिसांनी थांबवावा, कायद्याचं राज्य आहे, याचा परिचय मुंबई आणि महाराष्ट्राला करून द्यावा, असंही आशिष शेलारांनी अधोरेखित केलंय.