Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवनीत राणांची टीका : 'उद्धव ठाकरेंनी त्यांचे गुंड आमच्या घरी पाठवले आहेत'

नवनीत राणांची टीका : 'उद्धव ठाकरेंनी त्यांचे गुंड आमच्या घरी पाठवले आहेत'
, शनिवार, 23 एप्रिल 2022 (12:42 IST)
उद्धव ठाकरेंनी त्यांचे गुंड आमच्या घरी पाठवले आहेत. माझी पंतप्रधान मोदींना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं, असं विधान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा मुंबईत दाखल झाले आहेत. आज सकाळी 9 वाजता मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार असं त्यांनी जाहीर केलं होतं.
 
पण, त्यांच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर जमले. काही शिवसैनिक तर बॅरिकेड तोडून राणांच्या घरातही घुसल्याचं पाहायला मिळालं.
काल रात्रीपासून शिवसैनिक राणा यांच्या घरावर पहारा ठेवून होते. त्यात मुंबईचे आणि मुंबईबाहेरचे शिवसैनिकही होते. नऊ वाजता गर्दी वाढली आणि त्यावेळी शिवसैनिक बॅरिकेड तोडून राणांच्या घरात घुसले. पोलिसांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची संख्या कमी पडली. तासाभरापेक्षा जास्त काळ शिवसैनिक इमारतीच्या आवारात बसून आहेत आणि घोषणा देत आहेत. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना तिथून जायला सांगितलं तरीही ते तिथेच बसून आहेत.
 
शिवसैनिकांच्या या विरोधावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "एक आमदार आणि खासदारला घरी बंद करण्याचं कारण काय? त्यांना घरी येण्यापर्यंत ताकद कोणी दिली, गृहमंत्री त्यांच्या लोकांचा गैरवापर करत आहेत."
 
"पोलीस त्यांची कारवाई करतील. मात्र शिवसैनिकही अशा बदमाश लोकांना सामोरं जाण्यासाठी इथे आले आहेत" असं शिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले आहेत.
 
तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे वागा- संजय राऊत
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
ते म्हणाले, "कुणाच्या तरी पाठबळाने जर तुम्ही आमच्या मातोश्रीमध्ये जबरदस्ती येणार असाल, तर आम्ही काय स्वस्थ बसणार का. तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे वागा अन्यथा शिवसैनिकांना देखील तुमच्या घरावर हल्ला करण्याचा अधिकार आहे."
 
"हा केवळ शिवसेनेचाच उद्रेक नाही तर सामान्य जनतेच्या भावनांचा उद्रेक आहे. केंद्रीय सुरक्षा दलाचा वापर करुन जर शिवसेनेवर हल्ला करणार असाल तर आम्ही शिवसैनिक मरायला आणि मारायला मागे पाहणार नाही. तुम्ही जर आमच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही. हे सर्व करून जर राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर खुशाल लावा आम्हाला काही परवा नाही," असंही राऊत म्हणाले.
 
महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत - भाजपची टीका
मोहित कंभोज यांच्यावरील हल्ला आणि नवनीत राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांच्या घोषणेबाजीविषयी बोलताना भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
 
आज दुपारी पत्रकार परिषदेत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं, "नवनीत राणांना हनुमान चालिसेचं पठण करायचं होतं. एवढाच विषय होता. त्यांच्या घरापर्यंत शिवसैनिकांना जाण्याला मुभा दिली. राज्यात पोलिसांच्या डोळ्यादेखत सत्ताधारी पक्षाची गुंडगिरी सुरू आहे. सरकार पुरस्कृत दहशत आणि गुंडगिरी सुरू आहे. यात महाविकास आघाडीचं सरकार आगीत तेल ओतण्याचं काम करत आहे."
 
"भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. पण, आम्ही कायद्याला मानणारे आहोत. म्हणून लोकशाही मार्गानं जे करता येईल, ते करण्याला आमचा पहिला प्रयत्न असणार आहे," असंही ते म्हणाले.
 
राणा मातोश्रीवर येण्याची पहिलीच वेळ नाही
नवनीत राणा आणि रवी राणा यांची मातोश्रीवर आंदोलन करण्याची ही पहिली वेळ नाही.
 
2020 च्या ऐन दिवाळीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचा पवित्रा घेतला. शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईत 'मातोश्री' वर धडक देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
 
पण, पोलिसांनी त्यांना अमरावतीतच ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे आता काय होतंय यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

KKR vs GT : कोलकाता आणि गुजरात सामना आज, प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते