Publish Date: Wed, 10 Aug 2022 (16:17 IST)
Updated Date: Wed, 10 Aug 2022 (16:20 IST)
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे शेतातील पीक देखील पाण्याखाली गेलं आहे.शेतातील काम देखील बंद झाले आहे. हवामान खात्याकडून येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्याना अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भासोबत कोकण, घाटमाथ्यावरही पावसाने थैमान घातले आहे आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भातही मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच विदर्भातही पावसाचा जोर कायम राहिल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे.
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, अमरावती, गोंदिया या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.