Publish Date: Thu, 03 Jun 2021 (16:05 IST)
Updated Date: Thu, 03 Jun 2021 (16:09 IST)
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (३१ मे रोजी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. याच भेटीबद्दल खुलासा करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस शरद पवारांना का भेटले याची माहिती पुण्यामधील एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त पाटील हे पुण्यातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुंडेच्या कार्यासोबतच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींमधून भाजपचा संघर्ष संपणार आहे असा प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही. भेटीगाठी अनेक कारणांनी सुरु आहेत. शरद पवार आजारी आहेत, त्याबद्दल चौकशी करण्यासाठी फडणवीस गेले होते, असं पाटील म्हणाले. तसेच पुढे बोलातना पाटील यांनी, त्यानंतर (फडणवीसांनी) रक्षा खडसेंची भेट देखील घेतली. दुश्मन जरी असला तरी भेट घेणं, ही आपली संस्कृती आहे. संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. जर संवाद नसेल तर अडचण असते. पण इथे फडणवीस आहेत त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असं सांगितलं.