Publish Date: Fri, 27 Jan 2023 (08:02 IST)
Updated Date: Fri, 27 Jan 2023 (08:05 IST)
उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये गेले होते. ठाण्यातल्या आरोग्य शिबीरात त्यांची उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी एक छोटेखानी भाषणही केलं. माझ्यासोबत जे राहिले आहेत ते अस्सल कडवट शिवसैनिक बाकी विकाऊ विकले गेले असं म्हणत त्यांनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहारही अर्पण केला. मात्र आनंद आश्रम या ठिकाणी जायचं त्यांनी टाळलं. उद्धव ठाकरेंनी असं का केलं? याचं कारण समोर आलं आहे.
उद्धव ठाकरेंनी आनंद आश्रम या ठिकाणी जाणं का टाळलं?
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका या ठिकाणी आनंद आश्रम आहे. आज उद्धव ठाकरे ठाण्यात येणार होते त्याआधी आज सकाळी या आनंद आश्रमावर बाळासाहेबांची शिवसेना हा फलक उभारण्यात आला. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रम या ठिकाणी जाणं टाळलं असल्याचं बोललं जातं आहे. हा फलक लागला तेव्हापासूनच आता उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली होती. घडलंही तसंच.
ठाण्यातल्या टेंभीनाका भागात असलेल्या आनंद आश्रमात दिवंगत आनंद दिघे वास्तव्यास होते. याच आश्रमातून आनंद दिघे पक्षाचा कारभार करत असत. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर शिवसैनिक या आश्रमात येऊ लागले.
Edited By- Ratnadeep Ranshoor