Publish Date: Sat, 30 Jan 2021 (22:15 IST)
Updated Date: Sat, 30 Jan 2021 (22:16 IST)
भंडारा- सत्तेत आलो म्हणजे हातावर घडी घालून बसू नका... आपली जनतेशी बांधिलकी आहे ती अधिकाधिक मजबूत करण्याचे काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भंडारा जिल्हयातील साकोली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना केले.
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याचा आजचा तिसरा दिवस असून भंडारा जिल्हयातील साकोली विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीने दौर्याची सुरुवात झाली.
आजही भंडारा येथे अनेक प्रश्न आहे. या प्रश्नांची सोडवणूक करून लोकांना आदरणीय पवारसाहेबांच्या विचारांकडे आकर्षित करण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे असे मार्गदर्शनही जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. दुर्गम भागातही लोक रात्री उशिरापर्यंत आढावा बैठकांना उपस्थित राहत आहेत. या परिवाराचा आणखी विस्तार करायचा आहे म्हणून हा राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
भंडारा भागातील लोकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने असंख्य कामे केली आहेत. खासदार प्रफुलभाई पटेल यांनी धानाला जास्तीची किंमत मिळवून दिली आहे. मागे झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई राष्ट्रवादीने शासनाच्या माध्यमातून मिळवून दिली याची आठवण जयंत पाटील यांनी करुन दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष माजी मंत्री नानाभाऊ पंचबुधे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री विलासभाऊ शृंगारपवार, माजी आमदार राजू जैन, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, पक्षाचे नेते धनंजय दलाल, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.