Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Asian Games :एशियन गेम्समध्ये भारताचं शतक, आतापर्यंत 100 पदकं जिंकली

asian games
, शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (15:30 IST)
Asian Games :चीनमधील हांगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताने पदकांचं शतक पूर्ण केलंय. आतापर्यंत 100 पदके भारतानं जिंकली आहेत.
 
शुक्रवारपर्यंत (6 ऑक्टोबर) भारताने एकूण 95 पदके जिंकली होती. शनिवारी सकाळी तिरंदाजीत भारताने पहिली दोन पदके जिंकली, त्यानंतर महिला गटात भारताच्या ज्योती सुरेखा हिने सुवर्णपदक तर आदिती स्वामीने कांस्यपदक पटकावले.
 
यानंतर पुरुषांच्या तिरंदाजी प्रकाराचा अंतिम सामना दोन्ही भारतीय खेळाडूंमध्ये झाला. ओजस देवतळेने सुवर्ण तर अभिषेक वर्माने रौप्यपदक पटकावले.
 
यानंतर सुवर्णपदकासह कबड्डीतील भारताची 100 पदके पूर्ण झाली.
 
कबड्डीच्या अंतिम फेरीत भारताने चायनीज तैपेईचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
 
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भारतीय क्रीडापटूंचे अभिनंदन करताना, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने लिहिले, “ही कामगिरी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल. कठोर परिश्रम आणि उत्कटतेने काहीही साध्य करता येते हे यावरून दिसून येते.”
 
हॉकीमध्ये भारताला सुवर्णपदक
हॉकीच्या अंतिम सामन्यात भारताने जपानला 5-1 असं पराभूत केलं आहे. भारताने एशियन गेम्समध्ये एकूण 22 सुवर्णपदकं जिंकली आहेत. तर एकूण 95 पदकं जिंकली आहेत.
 
महाराष्ट्रातले तिरंदाज ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि आदिती स्वामी या तिघांच्या शानदार कामगिरीमुळे भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदकं जिंकता आली.
 
गुरुवारी (5 ऑक्टोबर) कंपाऊंड तिरंदाजीत पुरुषांच्या सांघिक स्पर्धेच्या फायनलमध्ये ओजस आणि प्रथमेशनं दिग्गज तिरंदाज अभिषेक वर्माच्या साथीनं सुवर्णपदक मिळवलं.
 
या तिघांनी बलाढ्य दक्षिण कोरियावर 235-230 अशी मात केली.
 
त्याआधी महिला टीमनं चायनीज तैपेईला हरवत सुवर्णपदक मिळवलं. आदिती, परनीत कौर आणि ज्योती वेन्नमचा समावेश असलेल्या भारतीय टीमनं 230-228 असा विजय मिळवला.
 
बुधवारी ओजसनं ज्योतीच्या साथीनं मिश्र तिरंदाजीतही सुवर्णपदक मिळवलं होतं.
 
ओजस देवतळे मूळचा नागपूरचा आहे. तो साताऱ्यात दृष्टी तिरंदाजी अकॅडमीमध्ये प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
 
अदिती स्वामी साताऱ्याचीच असून दृष्टी अकॅडमीमध्येच तिरंदाजीचं प्रशिक्षण घेते आहे. . अवघ्या 17 वर्षांच्या अदितीनं यंदा ऑगस्टमध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेतचं विजेतेपद मिळवलं होतं.
 
तर प्रथमेश जावकर मूळचा बुलढाण्याचा असून तिथेच त्यानं तिरंदाजीचे धडे गिरवले होते.
 
तिरंदाजीवर दक्षिण कोरियाचं वर्चस्व पाहता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणं ही मोठी गोष्ट मानली जाते. तसंच कंपाऊंड तिरंदाजीचा ऑलिंपिकमध्ये समावेश नसल्यानं आशियाई क्रीडा स्पर्धेतलं पदक हे अतिशय मानाचं मानलं जातं.
 
नीरज चोप्राची पुन्हा सुवर्णलूट, किशोरला रौप्य
भारताच्या नीरज चोप्रानं हांगझू एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर भारताच्याच किशोर जेनानं रौप्यपदक पटकावलं.
 
भालाफेकीच्या फायनलमध्ये नीरज आणि किशोर जेना या भारताच्याच खेळाडूंमध्ये स्पर्धा रंगली.
 
तिसऱ्या थ्रोवर किशोरनं 86.77 मीटरवर भालाफेक केली आणि नीरजला मागे टाकत आघाडी घेतली. त्यावेळीही नीरजनं किशोरचं अभिनंदन केलं. मग नीरजनं 88.88 वर थ्रो करत पुन्हा पहिलं स्थान मिळवलं.
 
नीरजचं सुवर्ण हे यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतलं भारताचं सतरावं सुवर्णपदक पदक ठरलं आहे. पदकांचा विचार करता, भारताची या स्पर्धेच्या इतिहासातली ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
या स्पर्धेत भारताला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. नीरजनं पहिल्यांदा भालाफेक केली, तेव्हा त्याची नोंदच झाली नाही. थ्रो रेकॉर्ड करणारं यंत्र निकामी झाल्याचं सांगण्यात आलं.
 
काही काळ वाट पाहिल्यावर नीरला आपला ‘पहिला थ्रो’ पुन्हा टाकावा लागला. त्यानं 82.38 मीटरवर भालाफेक करत पहिलं स्थान मिळवलं. दुसऱ्या प्रयत्नात 84.49 वर भालाफेक केली.
 
दरम्यान, किशोर जेनालाही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. किशोरनं पहिल्या प्रयत्नात 81.26 मीटरवर भालाफेक केली होती. पण त्याचा दुसऱ्या प्रयत्न तांत्रिक अधिकाऱ्यांनी फाऊल ठरवला.
किशोरचा पाय रेषेच्या आत असतानाही त्याला फाऊल ठरवण्यात आलं होतं. पण नीरजनं खिलाडूवृत्ती दाखवत याविरोधात अपील केलं. पंचांना तो निर्णय मागे घ्यावा लागला.
 
पुरुषांच्या 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीतही भारतानं सुवर्णपदक पटकावलं. तर महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये मात्र गतविजेत्या भारताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
 
महिलांच्या 800 मीटर शर्यतीत हरमिलन बैंसनं रौप्यपदक जिंकलं आणि एक अनोखा योगायोग साधला.
हरमिलनची आई माधुरी सक्सेना यांनीही 20 वर्षांपूर्वी बुसान एशियाड 2002 मध्ये याच 800 मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळवलं होतं.
 
हरमिलननं 1 ऑक्टोबरला 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीतही रौप्यपदक मिळवलं होतं.
 
अविनाश साबळेला स्पर्धेत दुसरं पदक
भारताच्या अविनाश साबळेनं पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.
 
अविनाशनं 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. पुरुषांच्या स्टीपलचेसमध्ये भारताचं ते पहिलंच सुवर्ण होतं.
 
अविनाश बीड जिल्ह्यातल्या मांडवा गावचा आहे. एका शेतकरी कुटुंबात 13 सप्टेंबर 1994 रोजी त्याचा जन्म झाला.
 
वयाच्या सहाव्या वर्षापासून तो घरापासून सहा किलोमीटर दूर असलेल्या शाळेत चालत किंवा पळत जात असे. बारावीचं शिक्षण झाल्यावर त्यानं लष्करात प्रवेश केला.
 
अविनाश 5 महार रेजिमेंटचा जवान म्हणून 2013-14 साली सियाचेन या अतिथंड युद्धभूमीवर तैनात होता. मग राजस्थान आणि सिक्कीममध्येही त्यानं ड्यूटी बजावली.
 
2015 साली तो लष्कराच्या क्रॅास कंट्री शर्यतीत सहभागी झाला आणि त्याच्या ॲथलेटिक्समधल्या कारकीर्दीला सुरूवात झाली.
 
अविनाशनं पुढे स्टीपलचेसची निवड केली आणि या स्पर्धेत वेगवेगळे राष्ट्रीय विक्रमही रचले.
 
ओजस देवतळे, ज्योतीला तिरंदाजीत सुवर्ण
नागपूरच्या ओजस देवतळेनं ज्योती सुरेखा वेन्नमच्या साथीनं एशियाडमध्ये तिरंदाजीत सुवर्णपदकाची कमाई केली.
 
ओजस आणि ज्योतीनं जिंकलेलं सुवर्ण हे यंदाच्या एशियन गेम्समधलं भारताचं 16वं सुवर्णपदक ठरलं.
 
कंपाऊंड तिरंदाजीच्या मिश्र सांघिक प्रकारात फायनलमध्ये ओजस आणि ज्योतीनं दक्षिण कोरियाच्या सौ जेवॉन आणि जू जेहून या जोडीवर 159-158 अशी मात करून एशियन गेम्समधल्या विक्रमाची बरोबरी साधली.
 
तिरंदाजीच्या या स्पर्धेत भारताचं हे एशियन गेम्समधलं पहिलंच सुवर्णपदक आहे. तसंच आजवरच्या एशियन गेम्समध्ये दुसऱ्यांदाच भारतानं तिरंदाजीत सुवर्णपदक मिळवलं आहे.
पारुल चौधरीला 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक
भारताच्या पारुल चौधरीने 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.तर जपानची रिरिका हिरोनाका दुसऱ्या स्थानी राहिली.
याआधी पारुलने 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेतही रौप्यपदक पटकावले होते.
 
यशस्वी जयस्वाल ट्वेन्टी20त भारताचा सर्वात युवा शतकवीर
एशियन गेम्समध्ये पुरुषांच्या ट्वेंटी20 क्रिकेट स्पर्धेत भारतानं उपांत्य फेरीत धडक दिली आहे.
 
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने 3 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात नेपाळवर 23 धावांनी मात केली.
 
सलामीला शतक ठोकणाऱ्या यशस्वी जयस्वालनं भारताच्या विजयाचा पाया घातला.
यशस्वीनं 49 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 7 षटकारांसह 100 धावांची खेळी केली. ट्वेन्टी20त शतक झळकावणारा यशस्वी हा भारताचा सगळ्यात तरुण खेळाडू ठरला आहे.
 
त्याच्या शतकामुळेच भारताला टॅास जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 204 धावा करता आल्या. तर नेपाळनं 20 षटकांत 9 बाद 179 धावाच केल्या.
 
भारताकडून आवेश खान आणि रवा बिश्नोईनं प्रत्येकी 3 विकेट्स काढल्या
 
टेबल टेनिसचं कांस्यही सुवर्णपदकाइतकंच महत्त्वाचं
एशियन गेम्समध्ये सुतीर्था मुखर्जी आणि ऐहिका मुखर्जी या दोघींनी भारताला टेबल टेनिसमधलं कांस्यपदक मिळवून दिलं आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय जोडीला उत्तर कोरियाच्या टीमकडून पराभव स्वीकारावा लागला.
 
पण सुतीर्था आणि ऐहिका महिला दुहेरीत टेबल टेनिसची उपांत्य फेरी गाठणाऱ्या पहिल्या भारतीय टेबलटेनिसपटू ठरल्या आहेत. शनिवारी उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी चीनच्या विश्वविजेत्या जोडीवर मात केली होती.
 
सुतीर्था आणि ऐहिका बालपणीपासूनच्या मैत्रिणी आहेत. त्यांनी मिळवलेलं पदक हे आशियाई क्रीडास्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताचं आजवरचं तिसरंच पदक आहे.
 
याआधी 2018 मध्ये भारतानं मिश्र दुहेरीत आणि पुरुष सांघिक स्पर्धेत कांस्यपदकं मिळवली होती.
 
टेबल टेनिसमध्ये चीनच्या वर्चस्वामुळे भारताला बहुतांश वेळा उपांत्यपूर्व फेरी पार करता आलेली नाही. सुतीर्था आणि ऐहिकानं मात्र ती मक्तेदारी मोडली आहेत.
 
अविनाश साबळेची सुवर्ण कमाई
रविवारी (1 ऑक्टोबर) अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.
 
पुरुषांच्या स्टीपलचेस शर्यतीत पहिल्यांदाच भारताला एशियन गेम्सचं सुवर्णपदक मिळालं आहे. अविनाशनं आधी कॅामनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत रौप्य पदक जिंकलं होतं.
तेजिन्दर पाल सिंह तूर याने गोळाफेकीमध्ये गोल्ड मेडल जिंकलं.
 
याआधी तेजिन्दर पाल सिंह याने 2018 सालीही जकार्ता इथे झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत गोळाफेकीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती.
 
निखत झरीन, आदिती अशोकला पदकं
भारताची स्टार बॉक्सर निखत झरीनला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला आणि त्यामुळे तिला कांस्यपदकावरच समाधान मानावं लागलं.
 
पण या कामगिरीमुळे दोनवेळा जागतिक बॉक्सिंग चँपियन जिंकणाऱ्या निखतचं पॅरिस ऑलिपिंकचं तिकिट निश्चित झालंय.
भारताची गोल्फर अदिती अशोकने रौप्य पदक जिंकले आहे.अदिती गोल्फमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
 
अदिती सुवर्णपदकाची दावेदार होती. मात्र, एका फेरीत खराब कामगिरीमुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
 
एशियन गेम्समध्ये ऋतुजाचं पहिलं सुवर्णपदक
पुण्याची टेनिसपटू ऋतुजा भोसलेने आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 
ऋतुजानं भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णाच्या साथीनं खेळताना फायनलमध्ये एन शुओ लियांग आणि सुंग हाओ हुआंग या तैवानच्या जोडीवर 2-6, 6-3, (10 – 4) अशी मात केली.
एशियन गेम्समध्ये ऋतुजाचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. ऋतुजाचा जन्म श्रीरामपूरचा. तिने टेक्सासच्या ए ॲंड एम विद्यापीठातून ह्युमन रिसोर्सेस अँड टुरिझममधली पदवी घेतली आहे.
 
2012 साली फेड कप स्पर्धेत भारतासाठी ऋतुजानं पदार्पण केलं. त्यानंतर ज्युनियर टेनिस आणि आयटीएफ स्पर्धांमध्ये विजेतीपदं मिळवली.
 
9 वर्षांची असताना टेनिस खेळण्यास सुरुवात. ऋतुजाचे वडील संपतराव राष्ट्रीय पातळीवरचे ॲथलीट होते, ते भालाफेक करायचे.
 
आपल्या मुलीने खेळात करियर करावं असं त्यांना वाटत असे. त्यातूनच तिची टेनिसशी ओळख झाली आणि तेच तिचं जीवन बनलं.
 
ॲागस्ट 2020 मध्ये महाराष्ट्राचा रणजी संघाचा माजी कर्णधार स्वप्नील गुगळेसोबत ऋतुजानं विवाह केला.
 
2019 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने ऋतुजाला गौरवण्यात आलं.
 
नेमबाजांचं यश
नेमबाजीत पुरुष संघाने 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. हा सामना जिंकून ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, स्वप्नील कुसळे आणि अखिल शेओरान यांनी सुवर्णकमाई केली.
 
महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत ईशा सिंग, पलक आणि दिव्या थडीगोल यांच्या संघाने रौप्यपदक जिंकले.
 
सिफत कौरनंनं नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात 469.6 गुणांसह अव्वल स्थान गाठलं आणि नव्या विश्वविक्रमाची नोंही केली.
 
या स्पर्धेत भारताच्याच आशी चौकसीनं कांस्यपदक मिळवलं. त्याआधी पात्रता फेरीत सिफत आणि आशीनं मानिनी कौशिकच्या सहाय्यानं 1766 गुणांसह सांघिक रौप्यपदकही पटकावलं.
 
21 वर्षांची सिफत पंजाबच्या फरीदकोटची आहे. मार्च 2023 मध्ये तिनं आयएसएसएफ शूटिंग वर्ल्जकपमध्ये 50 मीटर रायफल नेमबाजीत ब्राँझ मिळवलं होतं.
त्याआधी 25 मीटर पिस्टल प्रकारातही भारतानं सुवर्णपदक पटकावलं. मनु भाकर, ईशा सिंह आणि रिदम सांगवान या तिघींनी पात्रता फेरीत 1759 गुणांसह सुवर्णकमाई केली.
 
मनु आणि ईशाला फायनलमध्ये वैयक्तिक पदकासाठी खेळण्याची संधी मिळाली. ईशानं तिथे कांस्यपदक मिळवलं.
 
दरम्यान, पुरुषांच्या स्कीट नेमबाजीत भारताच्या अनंतजीत सिंग नारुकानं रौप्यपदक मिळवलं. अनंतजीतनं गुरजोत आणि अंगदवीर यांच्या साथीनं सांघिक कांस्यपदकाचीही कमाई केली आहे.
 
सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग चीमा आणि शिव नरवाल यांनी पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
 
त्याचवेळी महिलांच्या 60 किलो वुशू फायनलमध्ये रोशिबिना देवीने रौप्यपदक जिंकले.
 
अश्वारोहणात ऐतिहासिक पदक
26 सप्टेंबर रोजी दिव्याकृती सिंग, सुदिप्ती हाजेला, हृदय छेडा, अनुष अगरवाला यांचा समावेश असलेल्या भारतीय टीमनं घोडेस्वारीच्या 'ड्रेसाज' या प्रकारात मिश्र सांघिक सुवर्णपदक मिळवलं. त्यासोबतच चौघांनी अंतिम फेरीही गाठली.
 
1982 नंतर म्हणजे जवळपास 41 वर्षांनंतर भारतानं घोडेस्वारीत सुवर्ण मिळवलं आहे.
 
ड्रेसाज हा शब्द फ्रेंचमधल्या ड्रेस्यर (dresseur) वरून आला आहे. त्याचा अर्थ होतो ट्रेनिंग देणे.
 
घोड्याचं ट्रेनिंग कसं झालं आहे, हे दाखवण्यासाठी घोड्याकडून काही विशिष्ठ करामती करून घेतल्या जातात. जजेसचं एक पॅनेल घोडेस्वारांना पॉइंट्स देतं, त्याआधारावर विजेता ठरवला जातो.
अनुष अग्रवालने त्यानंतर वैयक्तिक कांस्यपदक जिंकले.
 
सेलिंगमध्ये पदकांची कमाई
26 सप्टेंबरचा दिवस भारताच्या सेलिंग म्हणजे नौकानयन टीमसाठीही खास ठरला.
 
नेहा ठाकूरनं मुलींच्या डिंगी-ICA4 कॅटेगरीत दुसरं स्थान मिळवलं आणि रौप्यपदकाची कमाई केली. यंदाच्या एशियन गेम्समधलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं.
 
17 वर्षांची नेहा नेहा मध्यप्रदेशात भोपाळच्या नॅशनल सेलिंग स्कूलमध्ये सराव करते. ती मुळची देवास जिल्ह्यातल्या हातपिपालामधील अमलताज गावची असून तिचे वडील शेतकरी आहेत तर आई गृहिणी आहे.
2022 साली अबूधाबीमध्ये एशियन सेलिंग चॅम्पियनशिपमध्ये नेहानं कांस्यपदक मिळवलं होतं आणि त्यामुळेच तिला हांगझू एशियन गेम्समध्ये खेळण्याची संधी मिळाली.
 
एशियन गेम्सच्या सेलिंग क्रीडाप्रकारात एका स्पर्धेत नाविकांना ठराविक शर्यतींमध्ये खेळावं लागतं आणि त्याआधारे एकूण गुण दिले जातात. ज्या शर्यतीत सर्वात खराब कामगिरी बजावली असते, त्या शर्यतीतले गुण वगळून नेट पॉइंट्स म्हणजे अंतिम गुण दिले जातात.
 
डिंगी-ICA4 प्रकारात एकूण 11 शर्यतींनंतर नेहानं 32 गुण कमावले होते. पण पाचव्या शर्यतीत तिला केवळ 5 गुण मिळाले होते.
 
त्यामुळे नेहाचा नेट स्कोर 27 गुण एवढा झाला आणि तिनं दुसरं स्थान मिळवतं रौप्यपदक खिशात टाकलं.
नेहापाठोपाठ एबाद अलीनंही पुरुषांच्या विंडसर्फर RS:X प्रकारात कांस्यपदक पटकावलं.
 
तर विष्णू सर्वानन यानंही पुरुषांच्या डिंगी - ILCA7 प्रकारात कांस्यपदक मिळवलं.
 
क्रिकेटमध्ये ऐतिहासिक सुवर्ण
भारताच्या महिला क्रिकेट टीमनं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. (25 सप्टेंबर) या ट्वेन्टी20 क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतनं श्रीलंकेला 19 धावांनी हरवलं.
 
एशियन गेम्सच्या इतिहासात भारताचं हे क्रिकेटमधलं पहिलंच पदक ठरलं आहे.
 
याआधी 2010 आणि 2014 साली या क्रीडास्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता, पण बीसीसीआयनं तेव्हा संघ पाठवला नव्हता.
 
भारताच्या महिला टीमनं याआधी 2022 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम्स) रौप्यपदक मिळवलं होतं. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतानं एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 
हांगझूमध्ये भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर स्मृति मंधानाने सर्वाधिक 46 तर जेमिमा रॉड्रिग्सनं 42 धावांची खेळी केली.
निर्धारित 20 षटकांत भारतीय महिलांनी सात विकेट्सच्या मोबदल्यात 116 धावा केल्या. तर श्रीलंकेच्या टीमला 20 षटकांत आठ विकेट्समध्ये 97 धावाच करता आल्या
 
भारताकडून तितास साधूनं तीन, राजेश्वरी गायकवाडनं दोन तर दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार आणि देविका वैद्यनं प्रत्येकी एक विकेट काढली.
 
या स्पर्धेत श्रीलंकेनं रौप्यपदक मिळवलं. तर बांगलादेशनं पाकिस्तानला हरवून कांस्यपदक पटकावलं.
 
पहिलं सुवर्णपदक नेमबाजीत
25 सप्टेंबरला सकाळी रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि दिव्यांश पनवर या नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात सांघिक सुवर्णपदक जिंकलं.
 
तिघांनी पात्रता फेरीत 1893.7 गुण मिळवून अव्वल स्थान गाठलंच, शिवाय नव्या जागतिक विक्रमाचीही नोंद केली. चीनचा 1893.3 गुणांचा जागतिक विक्रम भारतानं मोडला आहे.
 
ऐश्वर्यनं त्यानंतर वैयक्तिक कांस्यपदकही मिळवलं. या क्रीडाप्रकारावर भारताचं किती वर्चस्व आहे, याची झलकही या स्पर्धेत पाहायला मिळाली.
पात्रता फेरीत रुद्रांक्षनं 632.8 गुणांसह तिसरं, ऐश्वर्यनं 631.6 गुणांसह पाचवं तर दिव्यांशनं 629.6 गुणांसह आठवं स्थान मिळवलं.
 
पण एका देशाच्या दोनच नेमबाजांना फायनल गाठता येत असल्यानं, दिव्यांशला अंतिम फेरीत वैयक्तिक पदकासाठी खेळता आलं नाही.
 
फायनलमध्ये 20 शॉट्सनंतर रुद्रांक्ष आणि ऐश्वर्य बरोबरीत होते, तेव्हा शूटऑफमध्ये ऐश्वर्यनं त्याला मागे टाकलं. रुद्रांक्षचं आव्हान संपुष्टात आलं. पुढे ऐश्वर्यला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
 
दुसरीकडे, पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल नेमबाजीत विजयवीर सिद्धू, अनिश आणि आदर्श सिंगच्या भारतीय संघानं 1718 गुणांसह तिसरं स्थान मिळवत कांस्यपदकाची कमाई केली.
 
पहिल्या दिवशी पाच पदकं
एशियन गेम्समध्ये पहिल्या दिवशी (24 सप्टेंबर) भारतानं पाच पदकांची कमाई केली. पहिलं पदक महिला नेमबाजांनी मिळवून दिलं.
 
10 मीटर एअर रायफल प्रकारात मेहुली घोष, रमिता जिंदाल आणि आशी चौक्सी यांनी 1886 गुणांची नोंद करत दुसरं स्थान मिळवलं आणि सांघिक रौप्यपदक निश्चित केलं.
रमिताने 631.9, मेहुलीने 630.8 आणि आशीने 623.3 पॉइंट्स कमावले. या स्पर्धेत चीनने 1896.6 पॉइंट्सची कमाई करत सुवर्णपदक जिंकलं.
 
रमिता आणि मेहुलीनं स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आणि रमितानं तिथे तिसरं स्थान मिळवत वैयक्तिक कांस्यपदकाची कमाई केली.
 
भारताच्या अर्जुन लाल आणि अरविंद सिंग यांनी रोईंगमध्ये लाइटवेट डबल स्कल्स प्रकारात रौप्य पदक जिंकलं.
अर्जुन आणि अरविंदनं साडे सहा मिनिटांपेक्षाही कमी कालावधीत आपली शर्यत पूर्ण केली. या शर्यतीत चीनने सुवर्णपदक, तर उझबेकिस्तानने कांस्य पदक जिंकलं.
 
रोइंगमध्येच कॉक्स एट प्रकारात भारतीय संघानं रौप्यपदकाची कमाई केली.
 
तर पुरुषांच्या कॉके्स पेअर इव्हेंटमध्ये लेख राम आणि बाबू लाल यादव यांनी कांस्य पदक जिंकलं आहे.
 
लवलिना, हरमनप्रीत भारताचे ध्वजवाहक
23 सप्टेंबर 2023 रोजी चीनच्या हांगझू शहरात आशियाई क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं. एशियन गेम्समध्ये यंदा 40 क्रीडाप्रकारांत 481 स्पर्धांचा समावेश आहे.
 
त्यात भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, इराण आणि इंडोनेशियासह एकूण 45 देशांचे सुमारे 12 हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
 
उदघाटन सोहळ्यात ऑलिंपिक कांस्यविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन आणि हॉकी कर्णधार हरमनप्रीत यांनी ध्वजवाहक म्हणून भारतीय पथकाचं नेतृत्व केलं.
भारतानं एकूण 634 जणांचं पथक पाठवलं असून, एकूण 38 खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होतील.
 
अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतानं 65 खेळाडू पाठवले जात आहेत.
 
त्याशिवाय पुरुष आणि महिला फुटबॉल संघात 44 खेळाडूंचा समावेश आहे, तर नौकानयनात 33, नेमबाजीत 30 आणि बॅडमिंटनमधील 19 खेळाडूंचा संघ आशियाई क्रीडा स्पर्धा-2023 मध्ये सहभागी होणार आहे.
 


























Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इस्रायल म्हणतो, 'शत्रूला मोठी किंमत मोजायला लागणार', 'हमास'च्या आक्रमक हल्ल्यानंतर प्रतिक्रिया